श्री क्षेत्र नीरानरसिंहपूर हे सदा पवित्र असल्याने श्रीक्षेत्री केलेली धर्मकृत्ये फलदायी असतात.

  1. जावळ काढणे :
    स्वपुत्राचे जावळ क्षेत्री काढणे हे भक्त‍ भाग्याचे मानतात. कित्येयकदा असा नवसही केलेला असतो. प्रल्हातदासमोरील मंडपात अर्भकाचे जावळ काढतात. नंतर त्यास देवालयातच स्नान घालुन श्रींचे दर्शन करवितात. जावळ हा स्वपुत्रास नृसिंहभक्तीचा प्रथम पाठ देण्या‍चा ओनामा होय.
  2. वृतबंध :
    पुत्राचा व्रतबंध श्रीक्षेत्री करणे म्हणजे श्रीभक्तीचा संस्कार दृढ करणे होय. पुष्कळदा मातापित्यांनी असे नवसही केलेले असतात. गायत्री मंत्राचा उपदेश नृसिंहक्षेत्री मिळणे यात औचित्य आहे. हा विधी सभामंडपात होतो.
  3. विवाह :
    आपल्या पुत्राचे वा कन्येचे विवाह श्रीक्षेत्री करवून गृहस्थाश्रमाची दीक्षा श्रींच्या समक्ष व त्यांच्या मंडपात घेणे यात गृहस्थाश्रमीच्या पावित्र्याची कल्पना विचारवंताना येते. ‘नातिचरामि’ची शपथ या स्थायी घेतल्या‍ने ती जाणीव दृढ होते. विवाह देवव्दारी व्हावा अशी श्रध्दाही कित्येकदा असते. लग्न मंडपात लागते. इतर विधी बाजूच्या प्रांगणात केले जातात.
  4. वधूवर यात्रा :
    विवाह झाल्यानंतर स्वतःच्या नवपरिणित वधूसह भक्तगण श्रीदर्शनास येतात. कुंटुबातील इतर परिवार व घरचे देवही बरोबर आणून श्रींची पंचामृतपुजा करतात.
  5. नारायणनागबलि :
    वंशवृध्दयर्थ व वंशस्वास्थ्यार्थ हा विधी करतात. हा विधी केवळ संगमक्षेत्रीच केला जातो. या विधीची अनेक अंगोपांगे असुन काही पिशाचमोचन तीर्थावर, काही देवालयात व काही संगमावर करतात.